Pik Vima 2023| या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नाकारला
हिंगोली जिल्ह्यात 2023 साली खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिक विमा (Farmers of this district were denied crop insurance)मिळावा अशी अपेक्षा होती. परंतु कृषी विभागाने पिक विम्याचे प्रकरण योग्यरीत्या न हाताळल्याने विमा कंपनी केंद्र शासनाकडे केलेल्या अपीलमध्ये निकाल विमा कंपनीच्या बाजूने दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही.
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामामध्ये पाच लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा मिळावा यासाठी अर्ज केला होता. राज्य शासनाच्या वतीने केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. तीन लाख 26 हजार हेक्टर वरील पिकांचा विमा यावर्षी शेतकऱ्यांनी काढला होता यासाठी एकूण 1721 कोटी रुपयांची विमा संरक्षण मिळाले होते.
परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पाऊस पडला नसल्यामुळे पिकांची वाढ झाली नव्हती. त्यामुळे उत्पादना सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या पिकाला येलो मोझॅक या बुरशीजन्य रोगाने ग्रासले होते. यासह पाऊस न पडल्याने वाढ झाली नव्हती म्हणून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती पिक विम्याची विमा कंपनी शेतकऱ्यांना आग्रमी रक्कम देईल. परंतु विमा कंपनीने नुकसान कमी झाल्याचा दावा करून विभागीय आयुक्त राज्य शासनाकडे अपील केले होते. त्यानंतर तडजोड करण्याची तयारी सुद्धा विमा कंपनीने दर्शवली होती. मात्र पीक पाहणी अहवालानंतर पुन्हा कंपनीने 50% नुकसानीच्या अटीवर भरपाईसाठी तयारी दर्शवली. कृषी विभाग 59% नुकसानी पोटी 171 कोटी ची भरपाई देण्याची मागणी करत होता. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून 54 टक्के नुकसान भरपाई देण्याचे कंपनीला सांगितले होते. कंपनी तयार सुद्धा झाली होती. परंतु कृषी विभागाने या प्रकरणांमध्ये तडजोड केलीच नाही.
या प्रकरणात विमा कंपनीने केंद्र शासनाकडे अपील केले होते. या अपिलावर 15 जानेवारी रोजी निर्णय दिला असून उडीद, मूग, सोयाबीन या तीनही पिकामध्ये हिंगोली जिल्ह्यात उत्पादकता सर्वसाधारण असल्याचा निर्वाळा देत तांत्रिक सल्लागार समितीने पिक विमा फेटाळला आहे.
यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पिक विमा बाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता
मागील अनेक दिवसापासून पिक विमा मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. जिल्ह्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी तर चक्क किडनी, लिव्हर आणि डोळे अवयव विक्रीला काढले होते. विमा कंपनीने पीक विमा परतावा द्यावा अशी मागणी शेतकरी करू लागले होते. अनेक ठिकाणी पिक विमा साठी आंदोलन झाली परंतु यामध्ये लोकप्रतिनिधींनी मात्र कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. यामध्ये विम्याचा निर्णय लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भरोशावर सोडला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नावर सुद्धा कृषी विभागाने पाणी फिरवले.