Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेती (Agriculture) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने (Weather Update) पुढील 15 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’, मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’:
हवामान विभागाने आज विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर दुसरीकडे लातूर, बीड, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
विदर्भात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तांडव:
सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे फळबागांचे, विशेषतः लिंबू, संत्रा, आंबा आणि केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रब्बी, उन्हाळी पिके आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
पश्चिम विदर्भातही नुकसानीचे प्रमाण वाढत:
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीनही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अकोला जिल्ह्यात वादळ आणि गारपीट मुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. बुधवारी (ता. 10) सलग तिसऱ्या दिवशी वादळी पावसाने धुमाकूळ घातला. याचा मोठा फटका लिंबू आणि आंब्याच्या बागांना बसला आहे. अनेकांच्या बागा उन्मळून पडल्या आहेत.
पूर्व विदर्भातही पुन्हा तडाखा:
पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पुन्हा अवकाळी पावसाने दणका दिला आहे. त्याचा फटका उन्हाळी धान्य आणि भाजीपाला तसेच फळपिकांना बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मराठवाड्यालाही झोडपले:
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना गुरुवारी वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये परभणी जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात द्राक्ष आणि आंब्याच्या बागांना मोठे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात मोठे नुकसान:
जळगाव जिल्ह्यात पावसामुळे तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. केळी, मका, गहू आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. जामनेर आणि बोदवड भागांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.